थेऊर आणी हिंदू या दोन विषयांनी छोट्याशा मराठी ब्लॉगविश्वावाचे गेले आठ दहा दिवस गाजविले..ह्या दोन लेखांवर प्रतिक्रियांचा नुसता धो धो पाऊस पडला व अजूनही पडतोच आहे.(यात काही काळ मीही आघाडीवर होतो.)
हे दोन्ही विषय माझ्यासाठी खरे तर नको असलेलेच विषय होते..तरी सुद्धा माझी हीच मते व्यक्त करण्यासाठी म्हणून तिथे गेलो आणी गुरफटलो..खास करून हिंदूमध्ये. कोणी एक सौरभ नावाचा तोतया तिथे (हिंदूमध्ये)माझ्या प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया द्यायला लागला व तेही एक पातळी सोडून मग मीही चवताळलो व सुरु झाला एक (शुद्र) राडा….असो हे सगळ होणारच, चालणारच….ते फारसे महत्वाचे नाही..
महत्वाचे जें जें वाटले तेच इथे आता तुमच्याबरोबर शेअर करतो….
मला माझ्या या अगदी छोट्याश्या (उणेपुरे १५ दिवस) मराठी ब्लॉग जीवनात काही गोष्टी जाणवल्या, काही भावल्या, काही पटल्या, तर काही नाही आवडल्या…अशाच सर्व भावनांची, विचारांची मिळून माझ्या डोक्यात एक मिसळ गेले दोन दिवस तयार होत होती..तिचेच विश्लेषण मी येथे तुमच्यासमोर मांडतो.
सर्वप्रथम एका सनातन सत्याचा मला येथे येऊन पुन्हा साक्षात्कार झाला..तो म्हणजे प्रत्येक माणूस वेगळा आहे..त्यामुळे त्याचा ब्लॉगही वेगळाच, त्याची मतेही वेगळीच्..काहींची तर जगावेगळी…असो..पण एक गोष्ट या छोट्याशा प्रवासात प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे इथे आपल्याला एखाद्या गोष्टीतले माहीत असो वा नसो, त्या गोष्टीशी आपला संबध असो वा नसो आपण सार्वजनिक ठिकाणी मत मांडत आहोत हे ही लक्षात न घेता त्या गोष्टीवर अगदी ठामपणे मते मांडली जातात….व त्यावर प्रतिक्रियाही अगदी तितक्याच किंवा त्याहीपेक्षा ठामपणे दिल्या जातात. चला हा अमुकअमुक एक बोलतोय न मग ते बरोबरच असणार मग ते काय वाटेल ते लिहिलेले असले तरी चालेल. त्याने कितीही समज गैरसमज पसरले तरी चालतील. आपल्याला बोलायचा, मते मांडायचा हक्क आहे म्हणून आपण बोलायचे बास..एवढे एकच माहित…पण आपल्या हक्काबरोबर आपल्यावर जबाबदारीपण येते हेच बरेचजण सोयीस्कररित्या विसरतात व काहीही बरळायला लागतात.
मते मांडायला, एकमेकांशी भांडायला काहीच हरकत नाही उलट चांगलेच असे मी म्हणेन त्यातून एक जागरुकता निर्माण होते. आजुबाजुला काय चालले आहे याचे भानही येते.व विचारांची देवानघेवानही होते. नवीन दृष्टीकोन समजतात, जुने पुसले जातात. ठरविले तर खूप चांगल्या प्रकारे प्रबोधनही करता येते. काहीजण आपापल्या परीने तसा प्रयत्नही करताहेत..थोडा वेळची करमणूक यापेक्षाही इथे काहीतरी आपल्या कामाचे मिळेल अशा अपेक्षेनेही बरेच लोक मुशाफिरी करत इथे फिरत असतात. काहीना ते मिळतेही तर काहींना नाही. पण येथे एक गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळू शकते ती म्हणजे मित्र (जिवलग मित्र असे मी म्हणत नाही) मला ह्या अगदी थोड्याश्या कालावधीतही काही चांगली,समजूतदार माणसेही भेटली (मित्र म्हणायला अजून थोडा वेळ लागेल..पण होतील हळूहळू..)थोडीशी समजली..काहीमध्ये तर माझ्यात बदल घडवून आणण्याचीही क्षमता वाटली..जी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तसेच काही अगदीच मठ्ठ काही अगदीच निगरगट्टही भेटले पण ते कुठे नाही भेटत? कधी त्यांनी मनोरंजनही केले तर कधी त्यांचा त्रासही झाला. पण एकंदरीत खूप मजा आली व येतेय..मी हे ब्लॉग विश्व खूप आनंदाने एन्जॉय करत आहे…मला येथून खूप काही मिळत आहे जें मी वेळोवेळी परतफेड करण्याचा प्रयत्नही करेन.
काही जणांना वाटेल किंवा वाटत असेल की मी इथे नवीन असल्याने हे नव्याचे नऊ दिवस आहेत…असतील.. सध्या मला त्याचा विचार नाही करायचा. मी काही ठराविक ब्लॉगवर प्रतिक्रिया देतो.. अगदी दिल खोलके देतो..तो माझा स्वभावाच आहे..कंजूषपणे दोन शब्दात वा एका वाक्यात स्वत:ला व्यक्त करणे मला जमत नाही. द्यायचीच आहे जर प्रतिक्रिया तर विचारपूर्वक व मनापासून द्यावी. म्हणजे त्या प्रतीक्रीयेचेही चीज होते. नाहीतर काय उपयोग त्याचा त्या ब्लॉगरला व काय अर्थ त्या प्रतिक्रियेला? इथे मी इतक्या मोकळेपणाने प्रतिक्रिया दिल्या म्हणून काहीनी माझ्या मोकळ्या वेळेवरच बोट ठेवले. मी देशाचे नेतृत्व करावे इथपर्यंतही सुनाविले..असो ते सगळे मी खूप पॉझीटीव्हली घेतले…निदान माझी दखल तर घेतली जात आहे असे समजून दुर्लक्षही केले.
काहींना असाही संशय आहे की मी हे सगळे माझ्या ब्लॉग्सच्या हिट्स वाढाव्यात म्हणून करतो आहे तर त्यांचा संशय मी येथे दूर करतो. तुम्ही संशय घ्यायची गरज नाहीये इन फॅक्ट खात्रीच बाळगा माझ्या बऱ्याच बेसिक हेतूपैकी हाही एक हेतू आहे. व काय चुकीचा आहे?..मी काही अयोग्य तर करीत नाहीएना? इतरांच्या ब्लॉगवर माझी प्रामाणिक मतेच मांडतोय न…तेही अजिबात चाटेगिरी,चमचेगिरी न करता? त्याने त्या ब्लॉगरचाही फायदाच होत आहे. ह्या चर्चेसआठी कितीतरीजण फिरून फिरून ब्लॉग्वर परत येतात जर कोणी नाहीच दिल्या प्रतिक्रिया तर कोन येणार परत लेख वाचल्यानंतर? किंवा अगदीच गुळ्मुळित मिळमिळित प्रतिक्रियांसाठी का तुम्ही जाल परत तिथे?नाही ना…? असो माझा मुद्दा पटला नसला तरी हरकत नाही, कळला असेल तरी मिळवली…
इथे अजून एक गोष्ट मला नमूद करविशी वाट्ते ती म्हणजे ब्लॉग हे जरी स्वत:ला व्यक्त करायचे एक खाजगी माध्यम असले तरी त्याचे परिणाम सार्वजनिक असतात…इथे उघडपणे लिहिणारा कोणीही आपल्या सामाजिक जबाबदारीपासून आपले अंग झटकू शकत नाही. म्हणूनच त्याने पोस्ट्स लिहिताना ह्या गोष्टीचे भान राखले पाहिजे असे मला तरी वाटते..कोणाला हा आगाउपणाचा सल्ला वाटेल कदाचीत..पण माझ्या मते व अनुभवाने जर ते तुम्ही राखले नाही तर एक न एक दिवस त्या ब्लॉगरला त्याची किमत चुकवावी लागेल…कित्येक लेखकांना याचा प्रत्यक्ष जीवनात आलेला अनुभव आपण पाहिलाच असेल.
आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने खटकली ती म्हणजे बऱ्याच चांगल्या ब्लॉगवर बरेच चांगले लिखाण असताना तिथे कोणीही प्रतिक्रिया देत नाही..ठराविक लोकप्रिय ब्लॉग्सवर प्रतिक्रिया दिल्या जातात..(ज्या दिल्या जाव्यातच) याची कारणे अनंत असतील…इतका वेळ आहे कोणाकडे? पासून ते असे काही ब्लॉग्स आहेत हे ही माहीत नसन्यापर्यंत….अनेक…..पण मला असे वाटते की यावर आपल्यासारख्या प्रत्येकाने काहीतरी केले पाहिजे म्हणजे जेणेकरून इतरांना काही चांगले वाचावयास मिळेल व त्या ब्लॉगरलाही थोडा हुरूप येईल. आजच मला आलेल्या एक प्रतीक्रियेतून… चेतन गुगळे यांच्या ब्लॉगला भेट द्यायचा योग आला जास्त काही लिहीत नाही त्याबद्दल फक्त इतकेच सांगतो की विचारपूर्वक व विधायक हेतूने केलेल्या लेखनाला खुद्द महाराष्ट्र शासनाकडूनही कशी दखल घेतली जाते याचे ह्याइतके उत्तम उदाहरण मी तरी अजून पहिले नाही.
खूप लिहिण्यासारखे आहे अजून पण सध्या आवरते घेतो..तुमच्या मौल्यवान वेळेचाही प्रश्न आहे. शेवटी एकच सांगावेशे वाटते की ह्या मराठी ब्लॉग विश्वाला सध्या कशाची गरज मला जाणवली तर ती म्हणजे एकमेकांच्या सहकार्याची, प्रोत्साहनाची, विधायक टीका टिप्पणीची आणी जबाबदारीची.
आशा करतो माझा मुद्दा व हेतू मी तुमच्यापर्यंत काही प्रमाणात का होईना पोहचवू शकलो असेन.
विशेष नोंद: ही पोस्ट मी जरी मुख्यत: थेऊर व हिंदू हे दोन लेख व त्यावरील प्रतिक्रिया यांना समोर ठेऊन लिहिलेली असली तरी हे लेख व त्यांच्या प्रतिक्रियांचे लेखक यांच्याबद्दल माझ्या मनात पूर्णपणे आदराचीच भावना आहे. मला जे काही पटले नाही ते मी माझ्यापरीने मांडले. पर्सनली मी कोणालाही दुखाऊ इच्छित नाही. असे जर माझ्याकडून झाले असेल वा होत असेल तर जाहीररीत्या मी त्यांची माफी मागायला तयार आहे…(फक्त त्यांनी तसे माझ्या निदर्शनास आणून द्यावे.)



झंप्या.. तू छान लिहिलं आहेस. न समजण्या सारखा किंवा गैर समजूत व्हावी असा काही मुद्दा नाहीच आहे (आणि तसा तुझा कधीच नसतो कारण नेहमीच ते रोख ठोक असते.)
एकमेकांच्या पाठी खाजवून देण्याऐवजी सणसणीत रोखठोक कोणीतरी ब्लॉग विश्वात हवाच आहे. पण..तुझा खाली दिलेला quote:
“इथे अजून एक गोष्ट मला नमूद करविशी वाट्ते ती म्हणजे ब्लॉग हे जरी स्वत:ला व्यक्त करायचे एक खाजगी माध्यम असले तरी त्याचे परिणाम सार्वजनिक असतात…इथे उघडपणे लिहिणारा कोणीही आपल्या सामाजिक जबाबदारीपासून आपले अंग झटकू शकत नाही. म्हणूनच त्याने पोस्ट्स लिहिताना ह्या गोष्टीचे भान राखले पाहिजे असे मला तरी वाटते..कोणाला हा आगाउपणाचा सल्ला वाटेल कदाचीत..पण माझ्या मते व अनुभवाने जर ते तुम्ही राखले नाही तर एक न एक दिवस त्या ब्लॉगरला त्याची किमत चुकवावी लागेल…कित्येक लेखकांना याचा प्रत्यक्ष जीवनात आलेला अनुभव आपण पाहिलाच असेल.”
या बाबतीत आय बेग टू डिफर सर…!!
ब्लॉग न वाचण्याची फॅसिलीटी सर्व वाचकांना असतेच. एकदा कळले की हा ब्लॉग चुकीची/ अवाजवी/ आगाऊ/ अतिरेकी/ दहशतवादी/धार्मिक .. किंवा इतर दृष्टीने नकोशी बोअरिंग/नीरस/ चाकोरीबद्ध /कारकुंडी अशी लेखन कामाठी करतोय तर लगेच वाचन थांबवणे आणि ALT + F4 दाबणे वाचकाच्या हातात आहे.
लेखकाने लिहिताना कोणतेही सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, शारीरिक, मानसिक बंधन पाळणे म्हणजे नोटपॅडला सुद्धा जबरदस्तीने वर्डपॅड बनवण्या सारखं आहे. मूळ लिखाणावर काहीही बंधन असू नये असं माझं म्हणणं आहे.
अमुक एक तथाकथित चुकीचं लिहिलं म्हणून लेखकाला धर की झोडप या पॉलिसी मध्ये वाचकाचा वेळ बरबाद होतो. त्यापेक्षा त्या ब्लॉगचं वाचन बंद करावं
याची कारणं
१) ब्लॉग वाचून लोकांच्या सेन्सेटिव्ह मनावर परिणाम होऊन ती वेडं वाकडं वागायला लागतात ही भाबडी समजूत आहे. लिखाणाने आजवर कधी समाज बदलला नाही, घडवलाही नाही. ती एक करमणूकच असते सर्वांसाठी.
२) कितीही टीका केली तरी लेखक आपली मतं बदलत नसतो. हे कॉमन निरीक्षण आहे.
तेव्हा टीका करावी पण वैयक्तिक झोडपा झोडपी नको. आणि मग असे दिलगिरी खेद व्यक्त करण्याचे प्रसंगही नकोत.
समाप्त. धन्यवाद.
नचीकेतजी..ही तुमची पहिलीच प्रतिक्रिया. मला आवडलेल्या काही मोजक्याच ब्लोग्स्पैकी तुमचाही एक..त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेचे माझ्यासाठी महत्वही तितकेच..त्यामुळे मनापासून धन्यवाद..
>>>”लिखाणावर काहीही बंधन असू नये “>>> हा मुद्दा मला २००० टक्के मान्य आहे..व मीही त्याच मताचा आहे..पण एकदा मी असच काहीतरी छापले होते व त्याची किमत मला व माझ्या आजूबाजूच्या काही जणांना चुकवावी लागली होती…(ते काय होते ह्याबाद्दल पुन्हा केंव्हातरी) म्हणून मी म्हणतो लिहिताना भान ठेवावे..असो…
>>>”लिखाणाने आजवर कधी समाज बदलला नाही, घडवलाही नाही. ती एक करमणूकच असते सर्वांसाठी.”>>> हे मात्र मला २००० टक्के अमान्य आहे..लिखाणाला एक लेखकानेच इतके कमी लेखावे ह्याचेही मला वाईट वाटले.
महात्मा गांधी पासून ते अगदी मनमोहन सिंगापर्यंत सगळेजण आपल्या आयुष्यावर पुस्तकांचा किती प्रभाव पडला हे आवर्जून सांगतात.व जे एक सत्य आहे हे तुम्हीही मान्य कराल. लिखाणाने म्हणजेच पर्यायाने वाचनाने माणसांची मते बदलतात, दृष्टीकोन बदलतो व आणखी बरेच काही होते..जें तुम्हाला मी सांगण्याची गरज नसावी.
माझेच उदाहरण घ्यायचे झाले तर मी तुमाच्यासारख्या ब्लॉगर्सचे ब्लॉग वाचूनच हा ब्लॉग सुरु केला.हा माझ्यातील एक बदलच नव्हे का?
व एक माणूस बदलणे म्हणजे समाज बदलण्याचीच सुरवात नव्हे का?
ह्यासाठी पुन्हा गांधींनाच मदतीला घेतो….रेफरन्स विकिपीडिया
Unto This Last had a very important impact on Gandhi’s philosophy. He discovered the book in March 1904 through Henry Polak, whom he had met in a vegetarian restaurant in South Africa. Polak was chief editor of the Johannesburg paper The Critic. Gandhi decided immediately not only to change his own life according to Ruskin’s teaching, but also to publish his own newspaper, Indian Opinion.
तू म्हणतोस ते सर्व इंफ्ल्युएन्सेस सकारात्मक लिखाणाचे असतात.
एखादी व्यक्ती संकुचित लिहित असेल तर त्यातून समाजधारा उभी रहात नाही.
उथळ भडक विचारांच्या लोकांची वक्तव्ये/लिखाण ऐकून सामान्य मनुष्य फक्त “करमणूक” करून घेतो. बीलीव्ह मी..
फक्त त्या संघटनेचे चार चेले “सैनिक” रक्कस करतात आणि आपली प्रतिमा आणखी उणावून घेतात.
त्यातून समाजाला अनिष्ट वळण वगैरे काही लागत नाही..
…
“परिणाम भोगावे लागतील” ही म्हणजे “सेने”ची भाषा झाली.
म्हणून म्हटले. एखादे काही आवडले नाही तर त्यावर प्रहार करून बदलत बसण्यापेक्षा इतर काही वाचावे आणि आपणही निर्माण करावे.
योग्य नसलेल्या (आपल्या दृष्टीने) आणि निकृष्ट (आपल्या दृष्टीने) गोष्टींवर वेळ घालवून त्यांना महत्व देऊ नये. त्या सोडून द्याव्यात.
कदाचित त्या त्या व्यक्तीचे मत खूप अनुभवाने बनलेले असू शकते.
उदा. महेन्द्रजींचा लेख. त्यांनी काहीतरी लाईफ पाहिले असणार म्हणून ते असं म्हणताहेत. इफ यु हॅव् सीन अदर साईड, शो इट. ती तुझी टीका योग्यच आहे.
पण कोणीच केलेली व्यक्तिगत पातळीवर टीका उपयोगाची (इफेक्टिव्ह) नाही..
>>>योग्य नसलेल्या (आपल्या दृष्टीने) आणि निकृष्ट (आपल्या दृष्टीने) गोष्टींवर वेळ घालवून त्यांना महत्व देऊ नये. त्या सोडून द्याव्यात.>>> हे पटले व आवडले ही…
आणी हेही मान्य की प्रत्येकाचे अनुभव वेगळे त्यामुळे बघण्याचे दृष्टीकोनही वेगळे व दिसलेले सत्यही वेगवेगळेच….
आणखी एक गोष्ट मला प्रकर्षाने खटकली ती म्हणजे बऱ्याच चांगल्या ब्लॉगवर बरेच चांगले लिखाण असताना तिथे कोणीही प्रतिक्रिया देत नाही..ठराविक लोकप्रिय ब्लॉग्सवर प्रतिक्रिया दिल्या जातात…………..
१०१% खरे आहे. येथे ही कंपूशाही निर्माण झाली आहे.
ठणठणपाळ साहेब..कंपूशाही होवून्द्या हो निर्माण..तिची काळजी नका करू…मेंढरांना, हरणांना कंपूतच राहावे लागते..त्यांच्या सुरक्षतेसाठी तेच योग्यही असते…आपण राहावे सिंहासारखे..फिरावे इथेतिथे मुक्तपणे…काम करावे असे की लोकांना दखल घेणे भाग पडलेच पाहिजे. आपल्याला डावलून, ओलांडून पुढे जाऊच नये असे जर वाटत असेल तर तसे गुण आपल्यातही हवेत.
आपल्या ब्लोग्स्वर प्रतिक्रिया मिळवणे हे आपल्याच हातात आहे….इतरांच्या मर्जीवर नाही. असे याबाबतीतले माझे स्पष्ट मत आहे.
नेहमीप्रमाणे छानच लिहीले आहे.
मला प्रतिक्रीया व्यवस्थीत नाही देता येत
पण मनापासुन जे आवडले ते सान्गते.
तुमचा सडेतोड्पणा आवडला……
असेच नविन नविन विषयावर सकस लिखाण करित जा….
शुभेच्छा….
अस्मिताजी धन्यवाद…
खरेतर मी ब्लॉग सुरु करण्याचा हेतू झम्प्या( च) का व कशासाठी ह्यात दिलेलाच आहे..माझी वैयक्तिक मते किंवा मनातले काही मला इथे मांडायचे नव्हते. पण इतरांच्या पोस्ट्सला प्रतिक्रिया देता देता काही काही गोष्टी लक्षात यायला लागल्या…त्यातलेच एक म्हणजे माझ्याच ब्लॉगवर आता मला माझ्या मनाविरुद्ध माझ्याच मनातले लिहावे लागणार. कारण आता मीही आन्सरेबल झालो आहे..माझ्याबद्दल विचारलेल्या प्रश्नांना, शंकांना उत्तर देणे भाग आहे म्हणून..असो कधीतरी लिहीन याबद्दल सविस्तर..
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद!
झंप्या,
तुमचा ब्लॉग प्रथमच पाहण्यात आणि हीच पहीली पोस्ट वाचली.
मला श्री ठणठणपाळ यांची प्रतिक्रीया आणि तुम्ही त्यावर दिलेले प्रतिउत्तर दोन्ही पटले.
दोघांनीही माझ्या ब्लॉगला भेट द्यावी…..जाहीर निमंत्रण.
http://shatapavali.blogspot.com/
नमस्कार शांतीसुधाजी …प्रतीक्र्येबद्दल धन्यवाद..
तुमचे आमंत्रण स्वीकारून , तुमच्या ब्लॉगला नुकतीच भेट दिली….थोडी फुरसत मिळताच व्यवस्थित वाचून प्रतिक्रियाही नक्की देईन..तोपर्यंत लिहीत रहा…
मि झंप्या,
आपण ब्लॉगला भेट दिलीत आणि मी कृतकृत्य झाले. आपल्या माहीतीसाठी की मी ब्लॉग लेखन हे कुणाची प्रतिक्रीया येते आहे की नाही यावर थांबवून ठेवत नाही. त्यामुळे आपली प्रतिक्रीया नाही आली तरी माझं लेखन चालूच राहणार. कारण ते तुम्ही ब्लॉग विश्वात पाउल ठेवण्या आधीपासूनच चालू आहे. तेव्हा काळजी नसावी……:-)
शांतीसुधाजी तुम्ही नाराज झालेल्या दिसताय म्हणून एवढी तीव्र प्रतिक्रिया दिलीत…असो….. तुमचा ब्लॉग मी त्यादिवशी फक्त चाळला. प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या केनडा ट्रिपचा प्रवास मला पाहिल्या भागापासून वाचवायचा होता व तेंव्हा इतका वेळ नव्हता म्हणून मी म्हटले व्यवस्तीत वाचून प्रतिक्रिया देतो…त्यात कुठेही मी खूप कोणी मोठा आहे असा अविर्भाव माझ्या मनात नव्हता.
राहिला प्रश्न तुमच्या व कोणाच्याही लिखाणाचा तर ते कोणाच्याही प्रतिक्रियेचे मोहताज नसतेच…फक्त प्रतीक्रीयेसाठी कोणीही लिहीत नाही…व जो लिहितो त्याला ती मिळणे तितकेच अवघड होऊन बसते….व इतके समजायला मी येथे जरी नवीन असलो तरी….असो….तुम्ही पुन्हा येथे येऊन भेट दिलीत त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार….आणि पुन्हा एकदा मनापासून सांगतो तुमचे पोस्ट्स व्यवस्थीत वाचून मी तुम्हाला व्यवस्थितच प्रतिक्रियाही देईन हे ही माहित असताना की तुम्ही माझ्या ब्लॉग विश्वात पाउल ठेवण्याच्या खूप आधीपासून लिहिता व तुम्हाला कोणी प्रतिक्रिया नाही दिली तरी काही फरक पडत नाही.
ब्लोग चांगला आहे पण वाचून जाम पकलो
दीपकजी अशा स्तुतीची मला खरंच जाम गरज आहे.
अजूनही काही वाटले असेल तर बिन्धास सांगा.
(इतके पकूनही तुम्ही प्रतिक्रिया द्यायचा त्रास घेतलात हेही जाम आवडले बुवा आपल्याला.)
<>
Thanks Zampyaajee. For your compliments…
chetangugale@gmail.com / 09552077615
आत्ता थोडा उशीर झालाय चेतनजी म्हणून उद्या सकाळी फोन करतो तुम्हाला.चालेल ना?
आयच्या गावात सौरभ नावाचा मनुष्य… पण तो मी नव्हेच!!!
हा प्रकार काये थेऊर आणि हिंदूंचा?!?!
अरे मला माहित आहे तू नाहीस रे तो. तो एक तोतया होता. खोटा ई मेल अड्रेस तयार करून कमेंट द्यायचा…असो त्याला हुसकावून पळवून लावण्यात आले.
Hey झम्प्या… Bhava !!!
Tuza almost sagla bolg vachala… far divsani marathit le kahi tar navin ani bahri vachayala mi la….Marathila ani marathi mansala sadhya garaj ahe tuzaya sarkhya swatantraya vichrachya झम्प्या chi…
So…Keep it up..
महेशजी तुम्ही जवळ जवळ सगळा ब्लॉग वाचलात हे वाचून खरच खूप खूप बरे वाटले. प्रतिक्रियेसाठीही तुमचे मनपूर्वक धन्यवाद.